1999 चा तो नेमका दिवस मला आठवत नाही. त्या दिवशी मुलुंड पश्चिम येथील रस्ते दुतर्फा माणसांनी भरून गेले होते. ती येणार ..ती येणार याची सारे मुलुंडकर वाट पाहत होते. आम्ही सगळे पत्रकार तेव्हा मेहुल टॉकीज समोरील त्या परीच्या बंगल्याजवळ वाट पाहत होतो. टाईम्स ग्रुप सोडला तर कोणत्याच पत्रकारांना त्या बंगल्यात प्रवेश नव्हता. बाहेर एक बग्गी उभी होती. वाहिन्याचे कॅमेरामन. आणि अमाप बघे ........ अखेर आकाशी रंगाचा सरारा सावरत ती आली. फोटो कॅमे-यांचा लखलखाट झाला. आमची सा-याची धावपळ...पोलीसांचीही पळापळ.... विश्वसुंदरी झाल्यानंतर मुलुंडच्या कन्येची निघालेली ती मिरवणूक होती. शांती कॅम्पस् येथील तिच्या काकांच्या बंगल्यापासून ही मिरवणूक सुरू झाली. नेहरू मार्गाने पी. के. रोडवरून देवी दयाळ रोडवर अग्नीशमन केंद्र येथे ती समाप्त झाली.
युक्ता मुखी ही मुलुंड कन्या. जे. जे. स्कूल अॅकेडमीची विद्यार्थीनी. वझे महाविद्यालयात तीने पदवीपर्यंत शिक्षण घेतले. फारशी कुणाला कल्पना नसलेली ही विद्यार्थीनी. पण मिस वर्ल्डचा मुकुट तिच्या शिरी झळकला आणि आम्हां मुलुंडकरच नाहीत तर भारत वर्षाला आनंद झाला. मुलुंडमध्ये त्या दिवशी तिची निघालेली मिरवणूक शाही होती. मुलुंडकर अतिशय आनंदात होता.
माणसं मोठी झाली ती आपले राहते घर पुढच्या प्रगतीसाठी हमाखास सोडतात. युक्तालाही त्याला अपवाद कशी असणार. तिच्या प्रसिद्धीचा आणि सौंदर्यांचा फायदा मिळवण्यासाठी आपल्याकडे बॉलीवूड नेहमीच पुढे असते. युक्ताला सिनेमाच्या ऑफर आल्या. तिने मुलुंड सोडले. पण सौदर्याबरोबर अभिनय असावा लागतो. तो ऐश्वर्या, प्रियांका चोप्रा सारखे अभिनयाचे अंग नसल्याने ती त्या विश्वात चमकली नाही सपशेल आपटली. आणि बॉलीवुड अभिनेत्रींचा इतिहास आहे . त्या भले सर्व काही पडद्यावर पडद्यामागे रंगवतील. पण लग्न मात्र एखाद्या उद्योगपती वा कारखानदाराबरोबर करणार. हा भारतीय अभिनेत्रींचा इतिहास आहे. याला अपवाद फक्त ऐश्वर्या सारख्या बोटावर मोजण्या इतक्या अभिनेत्री आहेत.
विशेष म्हणजे तिच्या छळाच्या बाबतीत नेहमी पुढे असणा-या महिला संघटना गप्प आहेत. इतक्या तक्रारी तिने केल्या पण त्या अदखलपात्री कशा दाखल झाल्या. यातील काळेबेरे सांगायला कोणी ज्योतिषी नको..... यु्क्ताची ही बातमी वाचल्यावर मला तो मुलुंडमधील तिचा तो पाहिलेला दिवस आठवला. तिला पाहण्यासाठी प्रत्येक जण धडपड होता. त्यात माझ्यासारखा एक मुलुंडकर आणि पत्रकारही होता. तिच्या घरापासून निघालेल्या मिरवणुकीला लोकांची अलोट गर्दी होती. असंख्य माणसं होती. असंख्य माणसं रस्त्यावर उतरली होती. पतीच्या छळाच्या विरोध आज ती रस्त्यावर उतरली आहे. पण तिच्या सोबत तिचे कुटुंब वगळता कोणीच नाही...दैवाचे ...काळाचे चक्र किती उलटे आहे ना!
